पुणे : ‘कोणतेही लेखन माणसाला विचार करायला प्रवृत्त करत असेल तर ते कालातीत होते. तसेच लेखन वाचकांना आवडते. प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेल्या तिन्ही पुस्तकांमधील लेखन हे विचार करायला प्रवृत्त करणारे आहे. प्रसाद फेसबुकवर लिहितो, तरीही हे लेखन खूपच सखोल आहे हे पाहून खूप छान वाटले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ आयटीतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी काढले.
सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक प्रसाद शिरगांवकर यांच्या ‘i-बाप’, ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन २९ फेब्रुवारी २०२० रोजी पुण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते. कोथरूडमधील गांधी भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. ‘i-बाप’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आणि अन्य दोन पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन या वेळी झाले. तसेच तिन्ही पुस्तकांच्या ई-बुकचेही प्रकाशन करण्यात आले. या वेळी कवी वैभव जोशी उपस्थित होते.
डॉ. गोडबोले म्हणाले, ‘मी फेसबुक फारसे वापरत नाही. त्यामुळे तिथले लेखनही फारसे वाचलेले नाही. क्वचितच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरून येणारे लेखन वाचले आहे. ते टुकार असते असे माझे मत आहे; पण प्रसादने सगळेच लेखन फेसबुकवर केले असून, ते आज प्रकाशित होत आहे. प्रसादच्या तिन्ही पुस्तकांवर मी नजर टाकली. हे उत्कृष्ट दर्जाचे लेखन आहे. सध्या वाचण्याचा, ऐकण्याचा काळ कमी होत असल्यामुळे प्रसादने लहान-लहान लेख लिहिले आहेत. ते वाचल्यावर मला अल्बर्टो मोराव्हियाच्या ‘रोमन टेल्स’ या पुस्तकाची आठवण झाली. ते साधे-सोपे, पण विचार देणारे आणि सखोल लेखन आहे. फसवी नाती, खरी घरे-खोटी घरे, मैत्रीण हे लेख विशेष वाचण्याजोगे झाले आहेत.’
‘सध्या आपण कोण आहोत याऐवजी माझ्याकडे काय आहे हेच दाखवण्याची स्पर्धा सगळीकडे सुरू आहे. वस्तू साठवण्याकडेच सगळ्यांचा कल आहे. आयुष्यातील पोकळी वस्तूंनी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोक आत्मकेंद्री होत असल्याने एकूणात सगळे अधोगतीकडे चालले आहे. अशा काळात विचार करायला लावणारी ही पुस्तके वाचकांना थोडे शहाणे करू शकतील,’ असेही गोडबोले म्हणाले.
तत्पूर्वी, ‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी प्रस्तावनेत ‘बुकगंगा’चा प्रवास आणि फेसबुकवर प्रसिद्ध असलेल्या लेखकांचे लेखन पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यामागची भूमिका सर्वांसमोर मांडली. लेखक प्रसाद शिरगांवकर आणि त्यांच्या पत्नी अल्पना यांनी तिन्ही पुस्तकांतील काही लेख आणि कवितांचे अभिवाचन केले.
लेखक प्रसाद शिरगांवकर म्हणाले, ‘मी १९९८ला नोकरीनिमित्त बेल्जियमला गेलो, तेव्हा आजूबाजूला मराठी बोलणारे कुणी नव्हते. त्यातून मराठी ऐकण्याची, बोलण्याची तहान लागली. मराठीचा इंटरनेटवर शोध घेतला तर मायबोली नावाची वेबसाइट सापडली. तिथे लिहायला सुरुवात केल्यावर जगभरातील मराठी लोकांशी संवाद झाला. कुणी इंग्लंड, तर कुणी ऑस्ट्रेलियातून प्रतिसाद देत होते. तेव्हाच इंटरनेट या माध्यमाची ताकद लक्षात आली. तेव्हापासून लेखन सुरू आहे. फेसबुक पोस्टचे आयुष्य दोन तासांचे असते; पण २०१९मध्ये एकाने माझी २०१४मधली पोस्ट वाचून प्रतिक्रिया दिल्यानंतर माझे फेसबुकवरचे लेखन कालातीत आहे असे वाटले. ‘i-बाप’ पुस्तकात माझ्या आणि अल्पनाच्या पालकत्वाची कथा आहे. २२ वर्षांच्या जगप्रवासातील अनुभवांचे लेखन ‘भटक्याची डायरी’मध्ये केले आहे. आपल्याला आनंद देणाऱ्या लहान-सहान घटना-प्रसंगांचे वर्णन आणि माझे विचार ‘सुखांचे सॅशे’ या पुस्तकांतून मांडले आहेत. ते वाचकांना नक्कीच आवडतील.’
प्राध्यापिका गौरी ब्रह्मे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले आणि ‘बुकगंगा’च्या आसावरी कुलकर्णी यांनी आभार मानले.
(ही तिन्ही पुस्तके किंवा त्यांचे संच घरपोच मागविण्यासाठी किंवा त्यांची ई-बुक्स खरेदी करण्यासाठी ‘बुकगंगा डॉट कॉम’च्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)